घरमहाराष्ट्रघाईगडबडीत काहीही सुरू करणार नाही

घाईगडबडीत काहीही सुरू करणार नाही

Subscribe

जूनपासून मिशन बिगेन अगेन सुरू झाले आहे. त्यानुसार इतर सर्वांनी जगभरात ज्या काही गोष्टी घाईगडबडीत केल्या असतील त्या गोष्टी महाराष्ट्र करणार नाही. आपण ज्या ज्या गोष्टी सुरू केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊन आपण या गोष्टी सुरू केल्या आहेत. शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, त्या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी उघडायला परवानगी दिली आहे. पण, ज्या गोष्टी सध्या उघडता येणे शक्य नाही किंवा त्या उघडण्याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या सुरू केल्या जाणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाबाबत केलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी ठाण्यात आले होते. यावेळी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, गणपती उत्सव सुरू झाला आहे, दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले. परंतु आधी एक प्रश्न नेहमी विचारला जायचा, उत्सव कसा होणार, विसर्जन कसे होणार, पंरतु सर्वधर्मीयांनी सामाजिक जाणीवेतून उत्सव साजरे केले. त्यासाठी सर्वांना धन्यवाद देतो.

- Advertisement -

मुंबई आणि मुंबईला जोडून एमएमआरडी क्षेत्रात मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत होती. परंतु मागील महिनाभरात सर्वांनी अत्यंत खंबीरपणाने या साथीचा मुकाबला करायला सुरुवात केली. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या ही कमी झाली आहे. इतर राज्यात किंवा जगभरात लॉकडाऊन ओपन करण्याची घाईगडबड केली आहे. परंतु तशी घाई महाराष्ट्र अजिबात करणार नसल्याचेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

एखादी गोष्ट सुरू करायची असेल तर त्याची पूर्ण खातरजमा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. कोरोना रोखण्यात जरी कौतुकाची थाप मिळत असेल तरी गाफील न राहता आपल्याला हा आकडा शून्यावर आणायचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कल्याण-डोंबिवलीत जरी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी आता ती रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुढील 20 ते 25 दिवसात नक्कीच बदल दिसून येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

यावेळी त्यांच्या समवेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे सल्लागार अजोय मेहता, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, आरोग्य विभागाचे अधिकारी, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आदींसह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते म्हाडाने तयार केलेल्या कळवा आणि मुंब्य्रात 1100 बेडचे कोविड केअर सेंटरचे ई- लोकार्पण करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -