राज्यात सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुण्यामध्ये झाली. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं. ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आणि त्यांच्यासोबत काही अपक्ष आमदार देखील आमच्या संपर्कात आहेत. पण त्यांची नावं आत्ता जाहीर करून मी त्यांना अडचणीत आणणार नाही’, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, बोलताना जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला. संपर्कात असलेल्या आमदारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस मेगाभरती घेणार का? असं विचारलं असता ‘आम्ही मेगा भरती करणरा नसून मेरिटवर भरती करू’, असं जयंत पाटील म्हणाले.
१५ ते २० आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर?
‘सध्या भाजपमध्ये गेलेले आणि काही अपक्ष असे एकूण १५ ते २० आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. मात्र, त्यांची नावं आत्ताच उघड करणार नाही. त्यांची नावं सांगून त्यांना मला अडचणीत आणायचं नाही’, असं जयंत पाटील म्हणाले.
पुण्यामध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातल्या किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये राज्यातल्या परिस्थितीवर बैठक होणार होती. मात्र, ऐन वेळी ही बैठक स्थगित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झाली आणि कशावर एकमत झालं? हे महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या दोन दिवसांमध्ये शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा होऊन किमान समान कार्यक्रमाला अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.